यंदाचा पाऊस कसा राहील? पंजाबराव डखांचा सविस्तर अंदाज व शेतकऱ्यांना दिलेला अमूल्य सल्ला

Punjab Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रात मे महिन्याच्या सुरुवातीलाच वादळी पावसाने धडक दिल्यामुळे साऱ्या शेतकऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरु झाली “अरे, यंदा पाऊस लवकर आला म्हणजे काहीतरी वेगळंच घडणार!” खरंच, यंदा पावसाने आपली पारंपरिक वेळ मोडून जूनच्या आधीच राज्यातील अनेक भागात हजेरी लावली. त्यामुळे सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न “यंदाचा खरिप कसा होणार?” Punjab Dakh Havaman Andaj

हाच प्रश्न घेऊन आपण वळतोय प्रत्येक शेतकऱ्याच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू लोकप्रिय हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या अंदाजाकडे. एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर्षीच्या संपूर्ण पावसाळ्याचा सविस्तर आराखडा, त्यामागची पारंपरिक निरीक्षणे आणि शेतकऱ्यांसाठी दिलेला सल्ला अतिशय मनापासून मांडला.

पंजाबराव डख हे नाव आज केवळ महाराष्ट्रातच नाही, तर साऱ्या देशात पावसाच्या अचूक भाकितासाठी ओळखलं जातं. पण त्यांच्या ज्ञानामागे कोणतं मोठं विज्ञान किंवा उपग्रह नसून निसर्गातील बारकावे, पशुपक्ष्यांचे वर्तन, वनस्पतींची बहर, ढगांचे रंग, वाऱ्याची दिशा हेच त्यांचे खरे शास्त्र!

त्यांनी सांगितले की, “मी लहानपणापासून माझ्या आजोबा वडिलांकडून निसर्गाच्या लक्षणांचं निरीक्षण शिकलो. ढगांची हालचाल, आकाशाचा रंग, झाडांवरची फळं-फुलं, कीटकांची गडबड, सरड्याचा रंग बदलणे, चिमण्यांची धूळ आंघोळ, घराच्या झाडूखांबावर किड्यांची गर्दी… हे सगळं पाहून मी अंदाज बांधतो.”

त्यांच्या मते, दम्याचे रुग्ण जेंव्हा त्रस्त होतात, दरवाजे फुगतात, रामफळ, गावरान आंबा, जांभूळ, निंब यांना बहर येतो किंवा येत नाही ते पाऊस होणार की दुष्काळ पडणार याचे संकेत देतात. विज्ञानाला पारंपरिक निरीक्षणांची जोड दिली, की हवामानाचा खरा अर्थ समजतो, असं ते म्हणतात.

यंदाचा पावसाळा: महिना निहाय डखांचा अंदाज

जून महिना:

डख म्हणतात की, 1 ते 7 जून दरम्यान सूर्यदर्शन आणि कोरडं हवामान असेल. मात्र, 8 जूनपासून पुन्हा मान्सून सक्रिय होईल. सुरुवातीला तुरळक पाऊस आणि त्यानंतर हळूहळू वाढता पाऊस अनुभवास येईल.

13 ते 28 जून हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा असून, पेरणीसाठी अत्यंत योग्य असा कालखंड असेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी अगोदर न करता थोडा संयम बाळगावा.

जुलै महिना:

या महिन्यातही चांगल्या प्रमाणात पाऊस पडेल. पिकांची वाढ सुरळीत होईल. पुरेसा ओलावा राहील.

ऑगस्ट-सप्टेंबर:

डख यांचा अंदाज आहे की, या दोन्ही महिन्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल. धरणे भरतील. पिकांना पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही.

परतीचा पाऊस:

सप्टेंबरनंतरही परतीचा पाऊस समाधानकारक राहील. त्यामुळे रब्बी पिकांनाही याचा लाभ होईल. 2 नोव्हेंबरनंतर थंडीची चाहूल लागेल.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला!

या मुलाखतीत त्यांनी दिलेला सल्ला थेट शेतकऱ्यांच्या हृदयाला भिडणारा आहे. ते म्हणाले, “अजून तरी पेरणीची घाई करू नका. जमिनीला एक फूट ओलावा मिळेपर्यंत थांबा. 8-10 जूननंतर सुरूवात करा आणि 13 जूननंतर तर पेरणीला एकदम योग्य वेळ आहे.”

“यंदा लवकर आलेल्या पावसामुळे चांगला ओलावा तयार झालाय. त्यामुळे दुबार पेरणीची शक्यता कमी आहे,” असं सांगत त्यांनी शेतकऱ्यांच्या चिंतेला थोडा तरी दिलासा दिला.

आता पंजाब रावांचा हवामान अंदाज खरा ठरतो का खोटा याकडे पाहण्यासारखे राहणार आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टीने हा हवामान अंदाज खूप महत्त्वाचा असणार आहे पुढील काळामध्ये हवामान कसे राहणार हे पंजाबराव यांचे शब्द खरे ठरणार का हे देखील महत्त्वाचे आहे.

हे पण वाचा | सोन्याच्या दरात झाली रे मोठी घसरण; लगेच पहा 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर

Leave a Comment